
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 17th March 2026
देव देत असे प्रेमअनुभव। स्वीकारुनिया तो माझा प्रेमभाव। देवघेवीने प्रेमासी मी गुणिले । देवहृदयीचे प्रेम मी जाणिले ॥
कारेकर मंडळींचा निरोप घेऊन आम्ही निघालो. बरोबर शिदोरी घेतली होती. गाडी यायला अजून अवकाश होता. म्हणून फलाटावरच्या विश्रामगृहातच भोजन करून घेतले. तेवढ्यात गाडी आली व एकच धांदल उडाली. लगबगीने सर्वजण गाडीत शिरले व आपापल्या सीटस् वर स्थानापन्न झाले. गाडीने मुंबई च्या दिशेने कूच केले व वेग वाढत गेला . मंडळीही आता बर्यापैकी स्थिरावली होती . प्रभूंबरोबरच्या त्या आध्यात्मिक सहलीचा आनंद परतीच्या प्रवासात ओसंडून वहात होता.
त्या सगळ्या उत्साही वातावरणात प्रभूंबरोबर एकांतात संवाद साधण्याची संधी मी शोधत होतो. काही दिवसांपूर्वी प्रभूंनी मला एकूणच दत्तप्रभूंच्या कार्याचा झालेल्या लाभाविषयी काही लिखाण करायला सुचविले होते. मनन चिंतनाला जर लिखाणाची जोड मिळाली तर 'अधिकस्य अधिकं फलम् ' या उक्तीनुसार माझा ईश्वराविषयी प्रेम आणि भक्तिभाव दमदारपणे वाढण्याची दाट शक्यता प्रभूंना दिसत होती . मी लिहायला सुरूवात केली पण मंगळवारच्या किंवा एरवीच्या व्यक्तिगत भेटीत ते लिखाण प्रभूंना वाचून दाखवायचा योग येत नव्हता. आडवलीच्या प्रवासात अशी संधी मिळू शकते हे प्रभू जाणून होते. त्यांनीच मला तसे सुचविले होते व त्यांच्या ते लक्षातही होते. यथावकाश ते माझ्याजवळ आले मी माझ्या लिखाणाची पोतडी उघडली. मी दत्तपीठातील कार्याचा इतिहास लिहायला सुरुवात केली होती. गजाननस्वामींच्या संकल्पनेतील दत्तप्रभूंचे कार्य अवधूतस्वामींनी कसे समर्थपणे पूर्णत्वास नेले होते याचे वर्णन सुरुवातीच्या परिच्छेदांमध्ये आले होते. कार्यासंबंधी जे काही संबंधितांकडून ऐकले होते तेच लिहीण्याचा माझा प्रयत्न होता. दोन तीन पाने वाचून झाली होती आणि वाचता वाचता प्रभूंच्या चेहर्यावरील भाव मी न्याहळत होतो. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे खिचडी जमली नाही याची जाणीव मला झाली . प्रभूंनी मला थांबवले व एवढेच म्हणाले , " ठीक आहे , छान. पण लिखाणात स्वानुभवाची सखोलता यायला हवी" एवढे बोलून प्रभू उठले व माझे विचारचक्र सुरू झाले. प्रभूंना काय सांगायचे आहे ? मी अंतर्मुख झालो व माझे प्रभू माझ्याशी बोलायला लागले . " इतिहासाचे वर्णन कुणीही करू शकतो . लिहिण्याचे अंग असेल तर दोन चार संदर्भ इकडचे तिकडचे घेऊन आणि ऐकीव माहितीवर लिखाण आकर्षक करता येईलही .पण तो फक्त शब्दांचा फापट पसारा , तिथे भावाचा अभाव असेल.
जसे देव्हारा वेधक आहे पण आतमध्ये मूर्तीच नाही तर काय उपयोग ? आपले लिखाण इतरेजनांकरता नसून आपल्या प्रभूंकरता व स्वतःकरता असायला हवे. रामायणातल्या रामाच्या चरित्राचे चार ग्रंथ वाचून कुणीही वर्णन करेल पण माझ्या अनुभवाचा राम माझाच असणार आहे आणि तोच महत्वाचा आहे. स्वानुभवाचे लिखाणच चिंतन व मननाला पूरक ठरेल व भक्तिमार्गावर पुढे पुढे जायला उपयोगी ठरेल."
गाडीने वेग पकडला होता व माझ्या विचारांनाही वेग आला होता. 'प्रभू एक मुख्य भक्तजीवनात '. प्रभू हाच एकीएक विषय असायला हवा . मनामध्ये , कृतीमध्ये , वाचेमध्ये व लिखाणातही. माझ्या भक्तिमार्गावरील प्रवासात हे एक टिकूजी-नी-वाडी सारखे महत्वाचे वळण होते. या वळणावर उमेदवारीचा काळ मागे पडून मी work in progress च्या अवस्थेत प्रवेश केला होता . देव हृदयीचे प्रेम... श्रीपरमानंदार्पणमस्तु.