
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 17th February 2026
भक्ताने देवासी या जुळविले प्रेमनाते। देवप्रेम मिळविले जे सर्व नात्यापरते। जीवनात खेळविले प्रेमे परमानंदाते। देवा तुझे नि माझे जुळले हे प्रेमनाते ॥ रामदास्वामी स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारतात ' जगी सर्व सुखी असा कोण आहे ' आणि मग स्वतःच ' विचारे मना तूचि शोधूनि पाहे ' असे म्हणत मनाला कामाला लावतात. आता सुख म्हणजे नक्की काय असते ? मनासारखे घडले तर सुख व मनाविरुद्ध घडले की दु:ख अशी सुखदु:खाची सर्वसामान्य व सर्वमान्य व्याख्या केली जाते . कथित सुखप्राप्तीसाठी मानवाने साधने निर्माण केली . या साधनांनी देहसुख प्राप्त झाले पण मन तहानलेलेच राहिले. माझे तसे बरे चालले होते. मी सुस्थितीत होतो पण सुखस्थितीत नव्हतो. मनोविजयाचे वाचन चालू असताना रामदासस्वामींचा हा प्रश्न माझा पाठपुरावा करू लागला आणि म्हणून मी सुखस्थितीचा शोध अवतीभवती सुरू केला . करता करता माझ्या लक्षात आले की कळसा माझ्या काखेतच होता आणि मी उगाचच गावाला वळसा घालत होतो. सुखस्थिती तर प्रभूंच्या चरणाशीच होती. महाराजांनीही ग्रंथात म्हटले होतेच की संत सत्पुरुषच सर्वार्थाने सुखी पुरुष आहेत. त्यांच्या सहवासात सुखस्थितीचा अनुभव येत होताच . जगी सर्वसुखी असा कोण आहे या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि योगायोग असा की त्याच सुमारास सुखस्थितीचा अनुभव एरवीही येण्याकरता प्रभूंच्या कृपेने मला सुखी माणसाचा सदराही मिळाला. देवा तुझे नि माझे ... श्रीपरमानंदार्पणमस्तु