
Guru Shishya Sukhanandsamwad as on 10th February 2026
मी कोण कोठुनिया चरणासी तुझ्या आलो। लडिवाळ भावे माझ्या तुजसी मी प्रिय झालो। उचलोनि प्रेमे मज धरिले तू हृदयाते । देवा तुझे नि माझे जुळले हे प्रेमनाते ॥ प्रभू नेहमी सांगतात की प्रपंचात जो तो आपल्या स्वभावानुसार वागत असतो आणि प्रत्येकाला अहंकार असतो. अहंकारामुळेच संसारात वादविवाद निर्माण होत असतात. मनाच्या श्लोकांमध्ये रामदासस्वामी सांगतात ' तुटे वाद संवाद तो हितकारी ' हे बोलणे सोपे आहे. पण आपण कितीही जुळवून घ्यायचा प्रयत्न केला तरी समोरची व्यक्ती वाद घालतेच . मग यातून मार्ग कसा काढावा बरे ? रामदासस्वामी वाद संपवा म्हणून सांगतात पण प्रभू वाद संपवायचा कसा हे मार्गदर्शन करतात. प्रभू सांगतात की आपण दोन पावले माघार घ्यावी कारण , कारण एकच की 'तू माझा आहेस ना ? ' अत्यंत प्रेमाने प्रभूंनी विचारलेला हा प्रश्न मनातील सारी सारी जळमटं साफ करतो. खरचं की मी तर प्रभूंचा आहे ना ? मग क्षुल्लक गोष्टींकरता मी कशाला हट्ट करायचा ? प्रभूंचा हा मंत्र प्रत्येक आणीबाणीच्या प्रसंगात मला उपयोगी पडला . मी प्रभूंचा आणि प्रभूंचाच आहे हा भाव जेव्हा मनात स्थिर झाला तेव्हा लक्षात आले की काही गंभीर प्रसंग सोडले तर समस्या परिस्थितीत नव्हती तर माझ्या मनःस्थितीत होती. जशी जशी मनःस्थितीत सुधारणा होत गेली , तसे तसे समस्यांचे आपोआप निराकरण होत गेले व मन प्रभूंना अपेक्षित असलेल्या भक्तिमार्गाकडे वळत गेले. ' तू माझा आहेस ना ? ' या शब्दांची ही जादू होती. जादूगार तोचि खरा . देवा तुझे नि माझे ... श्रीपरमानंदार्पणमस्तु