
Guru Shishya Sukhanandsamwad as on 23rd Jan 2026
तव ठायीच्या मजसी पहावे। मज ठायीच्या तुज दावावे। भावाची त्या पूर्ती होई काही। तव प्रेमाच्या मी पडलो प्रवाही ॥ प्रभूंचा सहवास वाढत होता. संवाद म्हणावा तर प्रभूच बोलत असत . शुध्द अंतःकरणातून प्रकट होणारी त्यांची वचने मनाला विचार करायला प्रेरित करत होती. सरितेचा प्रवाही दृष्टांत तर ते वारंवार देत असत. सागराच्या ओढीने वहाणे हा सरितेचा गुणधर्म आहे , स्वधर्म आहे . लोकांना तिचा होणारा उपयोग प्रासंगिक व योगायोगाने होत असतो. आपल्याकडून सहजपणे कुठलाही आटापिटा न करता जर कोणाला मदत होत असेल तर करावी पण ते जीवनाचे ध्येय असू शकत नाही. लौकिक नाती जन्म झाल्यानंतर निर्माण झाली आहेत. पण जन्मापूर्वीपासूनच ईश्वराशी आपली नाळ जोडलेली आहे. तो ईश्वरच आपल्या अस्तित्वाचे मूळ आहे. हे मुलभूत सत्य आहे. आणि म्हणून नदीप्रमाणे आपल्या मुळाकडे धाव घेणे हे केवळ कर्तव्य नाही तर तेच क्रमप्राप्त स्वधर्माचरण आहे. मूळाच्या शोधाला नदी निघाली मग भेटीनंतरही आनंदाने वहातच राहिली. मलाही प्रभूंच्या रूपाने माझे मूळ गवसले . त्यांच्या नेत्रातून पाझरणारे प्रेम पुनः पुन्हा भेटीसाठी उद्युक्त करत राहिले . त्यांच्या प्रेमासाठी आसुसलेले मन त्यांच्याकडे वहात राहिले. तव प्रेमाच्या मी ... श्रीपरमानंदार्पणमस्तु