
Guru Shishya Sukhanandsamwad as on 29th May 2026
सुप्रभात , व्यक्तिगत प्रेमाच्या ओढीने सहवास व संवाद घडायला लागतो. कालांतराने या ओढीचे रुपांतर गोडीत होते. या गोडीतूनच जीवाची मनोभूमि तयार व्हायला लागते. पण जीवभाव जाता जात नाही. म्हणून मग जीवभावाची खोडी काढायला लागते. ही खोडी हलक्या थापट्यांसारखी असते. या प्रेमाच्या थापट्या धोपटत नाहीत तर थोपटतात. या थापट्यांनीच खोड जायला लागतो व मनोभूमित बीजाला मोड यायला लागतो. जय परमानंद 🙏🙏🙏
जीव श्वास घेई सदोदित, क्षणाक्षणाला जन्मापासून | ईश्वर प्राणवायू पुरवितो, अखंड अनंत काळापासून || प्राणवायू हवेमधून, श्वसनयंत्रणा देहामधून | या दोहोंचा मेळ जमता, जीवाकडूनि घडे श्वसन || अन्न मिळते पाणी मिळते, भूक भागते तहान निवते | पचन यंत्रणा काम करिता, देहाचे पोषण होते || हे सारे सहजची घडते, विनायत्न नकळत घडते | कोण करितो कोण घडवितो, जीवाच्या विस्मृतीत जाते || संत महंत भगवदभक्त, या साऱ्याचे मूळ जाणती | मूळ जाणुनी मूल्य सांगुनी, ईश्वराची महती गाती || ईश्वर तो ना दिसू शकतो, सभोवती परि खुणा तयाच्या | अन आम्हा जीवांसाठी, अवतरतो तो रूपे प्रभुच्या ||
मंगलमूर्ती परमानंद
सुप्रभात , देवाविषयी प्रेम वाटायला लागते आणि जीव भक्ती घडतेय असे समजतो. व्यक्तिगत प्रेम व्यक्ती पुरते मर्यादित रहाते. संवाद, सहवास व सानिध्याचे आकर्षण असते, संपर्कात सातत्यही असते पण संसारभाव सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असल्यामुळे संबंध प्रस्थापित होत असतीलही पण गर्भधारणा झाली नसेल तर भक्तिभाव पक्षी निखळ आनंदाची उत्पती होणार नाही. जय परमानंद 🙏🙏🙏